पुस्तक : तीन हजार टाके
लेखक : पद्मश्री सुधा मूर्ती (मराठी अनुवादिका – लीना सोहोनी)
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पाने : १५२
भाषा : मूळ भाषा – कन्नड. अनुवाद – मराठी
साहित्य प्रकार: अनुभवकथन, अनुवादित
वाचक : सर्व वयोगटातील
सुधा कुळकर्णी-मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० कर्नाटकातील शिगाव (शिग्गावि) या ठिकाणी झाला. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर. एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत . या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. सुधा मूर्ती मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. सुधा मूर्तीनी संगणक शस्त्रज्ञा व अभियंता म्हणून आपल्या करिअर ची सुरवात केली. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. या संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या कार्यरत आहेत. सुधा मूर्ती याना २००६ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तीन हजार टाके हे पुस्तक लेखिकेचे अनुभव कथन आहे. लेखिकेस ज्या ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याचे निरनिराळे पदर उलगडून दाखवले, आणि त्यांचा अनुभवाचा घडा ज्ञानानं भरला, त्या अनुभवांचे कथन त्यांनी या पुस्तकातून केले आहे. जसे की, ‘तीन हजार टाके’ या लेखातून त्यांनी देवदासींच्या आयुष्यातील समस्या व त्यांचे निराकरण करण्याचे ठरविल्यावर त्यांना काय अनुभव आले, त्याविषयी लिहिले आहे. सुरवातीला त्या देवदासींना मदत करण्यासाठी गेल्या असता, देवदासींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. कारण सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी त्यांना सुसंवाद साधण्यासाठी लागणारी कौशल्यं आत्मसात करावी लागणार होती. आपला पेहराव, संभाषणची भाषा गरजू लोकांसारखी बदलायला हवी होती. पण या सर्वांहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण करत असलेल्या कामावर मनापासून प्रेम करावं लागणार होतं याची जाणीव त्यांच्या वडिलांनी त्यांना करून दिली. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःत बदल घडवले. त्यानंतर त्यांनी देवदासींची संघटना बांधून त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय व वगैरे मार्ग काढले. याबद्दल त्यांचा गौरव करताना त्या देवदासी भगिनींनी आपल्या प्रेमाची ऊब देणारे टाके प्रत्येकीने विणून अशा तीन हजार टाक्यांचे भरतकाम केलेल्या गोधडीची भेट दिली.
या पुस्तकातील इतरही कथा प्रेरणादायी आणि सुंदर आहेत. समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना असणाऱ्या वेदना त्यांचे दुःख यांची प्रचिती आपल्याला अनुभवकथा वाचताना येते. याखेरीज समाजात मदत करत असताना समोर येणाऱ्या अडचणींची कल्पना सुद्धा वाचकाला येते. पुस्तकातील अखेरची कथा ही माझी जास्त आवडती आहे. हल्लीच्या तरुणाईला ज्या व्यसनांची सवय झाली आहे आणि ज्यामुळे त्यांचे आयुष्य त्यांच्या नकळत पोखरत चाललंय त्याबद्दल सुधा मूर्ती यांनी त्यांच्या आयुष्यात असे पीडित व्यक्ती कशा पद्धतीने बरे झाले याचे कथन करतात. यातून तरुणाईला आपण व्यसनांच्या चुकीच्या वाटेवर जात आहोत याची जाणीव होईलच शिवाय त्यातून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणाही मिळेल. या पुस्तकातील प्रत्येक कथा ही अनुभव आणि प्रेरणेने भरलेली आहे. अश्या मोठ्या व्यक्तींचे अनमोल अनुभव आपल्याला या पुस्तकातुन अतिशय सुंदर शब्दात वाचायला मिळतात. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवं.
मला खात्री आहे की हे पुस्तक नक्कीच आवडेल तुम्हाला!
पुन्हा अशाच एका नव्या पुस्तकाची समीक्षा घेऊन येईल.
Till then, HAPPY READING
-Shubham
©TheSDspeaks